Thursday, November 15, 2012

दुर्ग: किल्ले शिवनेरी


दुर्ग: किल्ले शिवनेरी
दिनांक: शनिवार, ०३ नोव्हेंबर २०१२

दुर्गस्थ: सौमित्र आणि सुनिता साळुंके

धोरणात्मक भोगोलिक स्थान (Strategic Geographical Location): Google Earth Image
------------------------------------------------------------------------------------------------------------
पहाटे ०६ वाजता माळशेज मार्गे जाणारी कुर्ला नेहरूनगर–जुन्नर गाडी पकडून निघालो. मुरबाडच्या पुढे आल्यावर जीवधन–खडा पारशी–नानाचा अंगठा याचं सुरेख दर्शन झालं. या मार्गावर आम्ही दोघेही प्रथमच येत होतो तेव्हा डावीकडे हरिश्चंद्रगड, पिंपळगाव जोगा जलाशय बघून भान हरपलं.

साधारण ११ च्या सुमारास जुन्नरला पोहोचलो. शिवनेरी एका दिवसात करण्याजोगा आहे मात्र मुक्काम करावयाचा असल्यास लॉजिंगची व्यवस्था आहे. मात्र त्याचं बुकिंग वगैरे करूनच यावं.

थोडी विश्रांती घेऊन आम्ही साडेतीन वाजता गडाकडे प्रयाण केले. जुन्नर बस स्थानकापासून बरोबर ०३ किलोमीटरवर गडाच्या चढाचा प्रारंभ बिंदू आहे. इथवर आपण चढ्या डांबरी रस्त्याने येऊ शकतो. राजमार्गाने शिवनेरीवर जाणे अतिशय सुखद आहे. वनविभागाने अत्यंत सुंदर पद्धतीने गडाची देखभाल केली आहे. जागोजागी बागा, बसण्याची व्यवस्था आहे. एक ७०-८० चे आजोबा सुद्धा डोक्यावरचं पागोटं हातात घेऊन गड चढत होते. महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, फाटक दरवाजा, कुलूप दरवाजा, शिपाई दरवाजा आणि हत्ती दरवाजा अश्या सात दरवाजांची मालिकाच या गडावर आहे. हे सर्व दरवाजे एकमेकांच्या माऱ्यात आहेत. या ऐसपैस मार्गावरून जात असताना अधूनमधून लहान लहान शॉर्टकट सुद्धा आपण घेऊ शकतो. मजा येतो.

लोखंडी खिळे असलेल्या लाकडी शिपाई (शिवाबाई?) दरावाज्यानंतर डावीकडची किल्ल्यावर जाणारी वाट न घेता आपण उजवीकडची वाट घ्यायची आणि शिवाईदेवीच्या दर्शनाला जायचं. महाराजांचं नामकरण आई शिवाई देवीवरून झालं हे आपल्याला ठाऊकच आहे. मंदिरातल्या पूर्णाकृती मूर्तीपुढे असलेली नाकडोळे कोरलेली स्वयंभू मूर्ती हि मुळ मूर्ती. आम्ही इथे शिरसाष्टांग नमस्कार केला. आऊसाहेब आणि स्वतः बाल शिवाजी कित्येकदा इथे आले असतील नाही?! कड्यात कोरलेल्या आणि प्रशस्त सभामंडप असलेल्या या मंदिरात आपण निशब्द होतो...

ज्या ठिकाणाहून आपण हि उजवीकडची वाट घेतली तिथे परत येऊन डावीकडच्या वाटेने गड चढू लागायचा. यानंतर मेणा आणि कुलूप दारावाज्यांतून पार होत आपण किल्ल्यावर प्रवेशतो. डावीकडे अंबरखान्याची (धान्यकोठी) इमारत आहे. रेलिंगच्या बाजूने जात राहिलं की पुढे गंगा आणि जमुना अशी कड्यात कोरलेली पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. इथे त्या पाण्यात आम्हाला मिनरल वॉटरच्या काही बाटल्या तरंगताना दिसल्या. हे असं का होतं किंवा काही लोक असं करू शकतात या विचाराने मन खिन्न होतं. मग शेजारीच असलेल्या “शिवकुंज” या शासनाने बांधलेल्या वास्तूत राजमाता आऊसाहेब आणि बालपणीच्या शिवरायांची पंचरशी धातूंमध्ये घडवेलेलं सुरेख शिल्प आहे. जिजाऊमातांची तेजस्वी मुद्रा संस्कारांच महत्व अधोरेखित करते. इथे खूप सकारात्मक भावना मनात निर्माण होते.

शिवकुंजापुढे आहे कमानी मस्जिद. यावर फारसी (?) लेख आढळतो. याला लागूनच कमानी टाके आहे. (शिवकुंजाच्या मागच्या बाजूने साखळीची चित्तथरारक वाट खाली उतरते).

इथून थोडंसं पुढे गेलो की आपल्याला सुंदर अशी दगडी इमारत दिसते. हि काही सामान्य वास्तू नव्हे. स्वराज्य सूर्याचा जन्म पाहिलेली हि मूर्तिमंत नशीबवान वास्तू आहे. याच्या तळघरात मराठी अस्मितेच्या सर्वोच्च मानबिंदूचा जन्म झाला... इथे साक्षात शिवप्रभूंनी जन्म घेतला. आपण या ठिकाणी आजही साक्षात सूर्याने झोके घेतलेला पाळणा बघण्याचा अवर्णनीय आनंद घेऊ शकतो. १९२५ साली करवीरच्या राजर्षी श्री. शाहू छत्रपतींच्या प्रेरणेने मुंबई प्रांताचे तत्कालीन शिक्षण अधिकारी श्री. भास्करराव जाधव यांनी या वास्तूचा जीर्णोद्धार केला. निश्चल आणि निस्तब्ध होऊन जाण्याची गडावरचे हे दुसरे ठिकाण. जिन्याने आपण पहिल्या मजल्यावर जायचे. प्रशस्त दिवाणखाना आणि पूर्वाभिमुख असलेला सज्जा आणि तिथून जुन्नर गाव पाहायचे. या वास्तूला लागूनच दक्षिणेला काही वास्तुंचे भग्नावशेष व जोते दिसतात. आपण जिना उतरून समोरच्या बदामी तलावाकडे जायचं. हा प्रशस्त तलाव आता बऱ्यापैकी कोरडाच आहे. इथून पुढे उत्तरेला कडेलोट टोक आहे. इथून जुन्नर गाव तसेच आजूबाजूचा बराच मुलुख न्याहाळता येतो. समोरच लेण्याद्रीचा डोंगर दिसतो.

इथून पुन्हा मागे शिवकुंजापर्यंत येऊन आपण बालेकिल्ल्यावर चढायचं. अंदाजे पाच एक मिनिटे लागतात. समोर इदगाह आणि त्याच्या मागे कोळी चौथरा आहे. १६५० साली मोगलांनी हजारो कोळ्यांची डोकी उडवली तो हा कोळी चौथरा.

आम्ही बालेकिल्ल्याहुनच सूर्यास्त पाहिला. आणि शिवकुंजापर्यंत उतरून आलो. पहिल्या दरवाज्यापासून ते इथपर्यंतच्या गडभ्रमंतीसाठी निवांतपणे म्हटलं तर ०३ तास पुरेसे आहेत.

आमच्या बाबतीत काही थरारक होणं मात्र बाकी होतं. ट्रेकिंगचे शूज घातले नसल्याने मी पुन्हा राजमार्गाने गड उतरायचा विचार केला होता मात्र सौंच्या इच्छेखातर साखळीचा मार्ग आहे कसा ते बघायला गेलो. गडाच्या पूर्व बाजूस कातळात कोरलेल्या या पायऱ्या येईपर्यंत आमचं उतारावर बऱ्यापैकी चालणं झालं होतं. पायऱ्यांच्या जवळ गेल्यावर आता मागे फिरण्यात “पॉईंट” नाही हे जाणवलं. मघाशी म्हटल्याप्रमाणे हि गडाची पूर्व बाजू असल्याने अंधार लवकर जाणवू लागला. शेवटी धीर करून आम्ही पायऱ्या उतरू लागलो. कलावंतीण प्रमाणे याही खेपेला ओढणीचा दोरासारखा अतिशय योग्य वापर करता आला. अर्थात हे केवळ वेळ निभावून नेण्यापुरतं. दोराला कुठलाही पर्याय नाही हे निश्चित. या वाटेवरून चढताना किंवा उतरताना पाठपिशवीचं ओझं वर ओढायला किंवा खाली सोडायला दोर असल्यास उत्तमच. आमच्या साध्या चपलांना ग्रीप नसल्याने त्या सारख्या पायऱ्यांवरून निसटत होत्या. भितीदायक प्रकार. सात मिनिटांचा तो थरारक खेळ संपला आणि थराराचा दुसरा अध्याय चालू झाला. समोर जुन्नर मध्ये दिवे लखलखू लागले. अंधार पडल्याची खुणच. अजून अर्धा तासाची गर्द जंगलातून उतरणारी वाट शिल्लक होती. आता मात्र मी विजेरी बाहेर काढली आणि आम्ही वेगाने उतरू लागलो. पूर्वेला निवाऱ्याच्या जागा असल्याने आणि पाण्याचे स्त्रोत असल्याने मला वन्य श्वापदांची अवचित अवेळी गाठ-भेट टाळायची होती. त्यामुळेच वन विभागाच्या जंगलाची हद्द असणाऱ्या भिंतीपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक होते. बिबळ्यांच्या परिसरात वावरताना वाकणे, बसणे असे प्रकार टाळावेत. शक्यतो ताठ चालावं.

शेवटी पुढच्या पंचवीस मिनिटांत साधारण ०६.४० च्या सुमारास आम्ही भिंत क्रॉस केली आणि पुढच्या दहा मिनिटांत डांबरी रस्त्याला लागलो. या अर्ध्या तासात मी तीन वेळा पाय घसरून पाठीवर पडलो होतो. रस्त्यावर पोहोचल्यावर मागे वळून गडाकडे पाहिलं तर अंधारगुडूप... पाऊणे सात वाजता. फक्त बाह्यरेषा दिसत होती. आपल्या तेजस्वी इतिहासाची पहाट पाहिलेल्या त्या शिवनेरीस त्रिवार मुजरा करून आम्ही दोघे अंधारलेल्या रस्त्यावर जड पावलांनी चालू लागलो.
--------------------------------------------------------------------------------------
* पाटबंधारे व वनखात्याची पूर्वपरवानगी असल्यास जुन्नरच्या ८ किलोमीटर वायव्येस असलेल्या अनुक्रमे माणिकडोह (शहाजी सागर जलाशय) धरण व बिबट निवारा केंद्र या ठिकाणांना भेट देता येईल.
* जुन्नर डेपो ते शिवनेरी पायथा बस सेवा आहे (एक मार्गी रु. १०). या बसेस शिवनेरी मार्गे वडज, कुसूर तसेच अन्य गावांत जाणाऱ्या आहेत. डेपोत चौकशी करावी. तसेच ऑटो केल्यास एक मार्गी रु. ५०-६० होतात.   
* शिवनेरीच्या पायथ्याला असलेलं हॉटेल शिवनेरी हलक्या न्याहारी / जेवणासाठी वगैरे उत्तम आहे. याच ठिकाणी जुन्नर डेपोत जाणाऱ्या व येणाऱ्या एस. टी थांबतात.
* जुन्नर शहरात शंकरपुरा पेठेत असलेल्या श्री. साठे यांचे “श्री” भोजनालय हे अत्यंत उत्कृष्ट आहे. इथे जेवायलाच हवं. खरं तर इथेच जेवायला हवं.
* शंकरपुरा पेठेतून डेपोला येताना जुन्या जुन्नरची दगडी तटबंदीची वेस गतकाळाची साक्ष देत विदिर्णावस्थेत उभी आहे. 

Monday, November 5, 2012

घनगड आणि तेलबैला


घनगड आणि तेलबैला

भेट दिलेले दुर्ग: घनगड आणि तेलबैला

दिनांक: २० व २१ ऑक्टोबर २०१२

दुर्गयात्री: १. आतिश नाईक, २. किशोर सावंत, ३. सौमित्र साळुंके

------------------

लोणावळ्याच्या साधारण दक्षिणेला ३५ किलोमीटरवर घनगड स्थित आहे. गडाची उंची समुद्र सपाटीपासून ७९४ मीटर असून गड पायथ्यापासून २०० मीटर उठावला आहे.

१९  तारखेच्या रात्री साडे अकराच्या मुंबई (बोरीवली डेपो) – स्वारगेट एशियाडने मध्यरात्री अडीच वाजता लोणावळा डेपोत पायउतार झालो. भाम्बर्डे (बऱ्याच ब्लॉग्जमध्ये या गावाचा उल्लेख भाम्बुर्डे असा आढळला आहे) गावी जाणारी एस.टी नऊ वाजताची असल्याने सकाळी सात वाजेपर्यंत थोडी विश्रांती घेतली. डेपोकडे तोंड करून उभे असल्यास आपल्या डाव्या हाताला सगळ्यात शेवटी पाण्याची व्यवस्था आहे. इथे दंतमंजन इत्यादी उरकावे. अलीकडच्या ‘सुलभ’ मध्ये पाणीसुद्धा सुलभ किंबहुना मुबलक आहे तेव्हा चिंता नसावी. हे विस्ताराने लिहिलं कारण घनगड, कोरीगड, तेलबैला असे गिरीदुर्ग तसेच निसर्ग भटकंतीची काही ठिकाणे गाठण्यासाठी आधी लोणावळा डेपो गाठावा लागतो. बेस विलेज असतं तसा हा बेस डेपो.

लोणावळ्याहून भाम्बर्डेला जाणारी हि महामंडळाची लाल डबा बस हे एक जागतिक आश्चर्य होऊ शकतं. साल्तर खिंडीच्या अलीकडेच डाव्या बाजूचा रस्ता पकडून मौजे तिस्करी मार्गे, मुळशी जलाशयाची एक जीभ डावीकडे ठेऊन संपूर्ण डोंगर रांगेला वळसा घालून भाम्बर्डेला पोहोचते. हा गाडीमार्ग इतका अरुंद आणि उंच सखल आहे कि या मार्गावर सार्वजनिक वाहन चालवणे निव्वळ मास्टरीचं काम आहे. आतिशची प्रतिक्रिया मार्मिक होती. म्हटला इथे एस. टी.ला सुद्धा ट्रेक करत यावं लागतं. असो, मार्गे तिस्करी, रस्त्याची मस्करी बघत आम्ही सव्वा अकराच्या सुमारास भाम्बर्डेत दाखल झालो. (लोणावळा ते भाम्बर्डे गाडी भाडे – रू. ११४ तिघांचे)

इथून एक गाडीवाट वळसा घेऊन थेट एकोले या घनगडाच्या पायथ्याच्या गावी जाते. डावीकडे नवरा-नवरी-भटोबाचे सुळके आपलं लक्ष हमखास वेधून घेतात. उजवीकडे शेतभर नाचणी आणि भात झुलत असतो. एकोले गावात शिरण्याआधीच डावीकडे एक ठळक पायवाट गडावर जाते. भाम्बर्डे ते एकोले अंतर पंधरा वीस मिनिटांचे आहे. तर या पायवाटेने आपण दहा-पंधरा मिनिटांत गारजाईच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिरासमोर दीपमाळ आणि दगडात कोरलेले मारुतीराय आहेत. घनगडावर मुक्काम करावयाचा झाल्यास हे मंदिर उत्तम आहे.  

पुढे गेल्यावर एक लोखंडी शिडी दिसते. इथून घनगडाचा कडा डावीकडे ठेवून सरळ गेल्यास एक शिलाखंड जमिनीत तिरपा रुतून बसलेला दिसतो. गडाचा कडा व हि शिळा यामध्ये एका लहानश्या गुहेत वाघजाई देवीची दगडी मूर्ती आहे. त्याच्याच पुढे कड्याला बिलगून जाणाऱ्या अतिशय अरुंद वाटेने काळजीपूर्वक गेल्यास सुमधुर पाण्याचं टाकं लागतं. या इथून पुन्हा आपण शिडीपाशी यायचं. या लोखंडी शिडीवर काळजीपूर्वक चढल्यानंतर आपण गडाच्या माथ्याजवळ पोहोचतो. माथ्यावर जाणाऱ्या मुख्य दरवाज्यात प्रवेशताच वाऱ्याचे वेगवान झोत आपलं स्वागत करतात. निवांत गेल्यास एक तास आणि सरळ सरळ गेल्यास अर्धा तास एव्हढा वेळ माथ्यावर पोहोचण्यास आपल्याला लागतो. शक्यतो गडभेटी निवांत करावी. निरीक्षण, टिपण करत गड दर्शन करावे. शर्यत लावू नये.

गडाच्या माथ्यावर आज प्रचंड गवत मजले असून बरेचसे अवशेष या गवतरानामुळे गुडूप झाले आहेत. माथ्यावरून आजूबाजूचा अतिशय विस्तीर्ण प्रदेश दिसतो. घाटमाथा आणि कोकण दोहोंचे दर्शन होते. इथून तेलबैलाचे सुळके अत्यंत मनोहारी दिसतात. सुधागड हाकेच्या अंतरावर असल्यासारखा भासतो.

सदाशिवरावभाऊंच्या तोतयास या किल्ल्यावर कैद करण्यात आले होते. या हि किल्ल्याने निजामशाही, आदिलशाही आणि शिवशाही पाहिली आहे.

आपण आल्या वाटेने आपण पुन्हा एकोले गावात यायचे. इथल्या विहिरीतून भरपूर पाणी घेऊन आता खरोखर भरपूर चालण्याची तयारी करायची. जवळजवळ दहा किलोमीटर आणि तेही उंच सखल गाडी रस्ता. आम्ही जवळ जवळ पाऊणे दोन तास चालल्यानंतर तेलबैला गावाच्या किलोमीटर भर अंतरावर असताना आम्हाला वडूस्ते-लोणावळा गाडी मिळाली. लांब डावीकडे तेलबैलाच्या मागच्या बाजूला सायंकाळच्या किरणांचा कॅनव्हास आणि मित्रांची सोबत असताना दुरवर जाणारी हि वाट फुलांसारखी टवटवीत वाटू लागते.

संध्याकाळी बरोबर ६ वाजता तेलबैला गावात आम्ही पोहोचलो होतो तेव्हा आमच्या समोर सुर्यनारायण क्षितिजाहून दिसेनासे झाले मात्र त्यांची आसमंतात पसरलेली रक्तवर्णी प्रभा आम्हाला खिंडीपर्यंत पोहोचायला पुरेशी होती. साधारण पस्तीस मिनिटांत दोन्ही सुळक्यांच्या मधल्या खिंडीतल्या बहिरोबाच्या मंदिरात आम्ही पोहोचलो. या खिंडीपर्यंतची तेलबैलाची उंची ७३० मीटर असावी. वरचे सुळके तीनेकशे मीटर असावेत. बहिरोबाच्या शेजारीच पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. हे मंदिर ज्या गुहेच्या आधारे बांधलं आहे, त्या गुहेचा सुळका/ भिंत म्हणजे तेलबैला गड. या भिंतीवर तसेच समोरच्या सुळक्यावरसुद्धा आरोहण करता येतं मात्र ते सुनियोजित तांत्रिक प्रस्तरारोहणाचा विषय होत. प्रस्तरारोहण श्रेणी: अवघड    

ऑक्टोबरच्या त्या रात्रीचा त्या खिंडीतला वारा मी तुम्हाला कसा ऐकवू? वाट सोपी आहे. एकदा तुमची वाट वाकडी करा.

किसान मेने नामक गावकरी आणि इतर दोन गावकरी सुद्धा इथे रात्री मुक्कामी होते. त्यांनी दिलेली नाचणीची भाकरी खाऊन त्यांच्याकडून खालच्या गावांमध्ये चमचमणाऱ्या प्रकाशदिव्यांच्या आधारे परिसराची माहिती घेतली. या वेळी वारा अक्षरशः धिंगाणा घालत होता.

दिवसभर असं उंडारल्यानंतर रात्री त्या मंदिरात मुक्काम केला. शर्ट, विंडचिटर, माकडटोपी आणि पांघरून असूनसुद्धा थंडी वाजत होती. वाऱ्याच्या उनाडक्या रात्रभर चालू होत्या.

पहाटे सहा वाजता मला जाग आली. आतिश आणि किशोर दोघेही अंथरुणातून बाहेर पडेनात तेव्हा मी बाहेर येऊन समोरच्या सुळक्याच्या पायाशी असलेल्या खोबणीत जाऊन बसलो. अंधुक उजेड, चोहोबाजुच्या डोंगरांची लाइनिंग आणि अवखळ वाऱ्याचा अथक आवेश बघत बसून होतो. थोड्या वेळाने दोघेसुद्धा बाहेर आले आणि आम्ही तिघे निसर्गाचं ते जागं होण्याचं दृश्य डोळ्यांत साठवत निशब्द उभे होतो.

उजवीकडच्या भिंतीखाली एक चूल असून प्रचंड वाऱ्यामुळे आम्ही चहा करण्याचा बेत रद्द केला आणि लोणावळ्यात न्याहारी करायची ठरवलं. पाऊणे आठ वाजता आम्ही झपझप उतरत वीस एक मिनिटांत पायथ्याशी पोहोचलो. लोणावळ्याला जाणारी वडूस्ते-लोणावळा एस. टी तेलबैला गावात सकाळी बरोबर साडे आठला पोहोचते. याच एस. टी.ने सालतर खिंड मार्गे, कोरीगडाच्या पायथ्याशेजारून, ऍम्बी व्हॆली मार्गे लोणावळ्यात पावणे दोन तासात पोहोचलो. इथून मुंबईत यायला महामंडळाच्या चिक्कार गाड्या आहेत.

टिपणे:

१.    या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे प्रवास केल्यास संपूर्ण खर्च (सोबत आणलेल्या विकतच्या खाद्यपदार्थांची किंमत वगळून) रुपये तीनशेपेक्षा जास्त येणार नाही.

२.    घनगडावर चूल पेटवण्यास योग्य जागा व पुरेसे सरपण मिळू शकते.

३.    तेलबैलावर चूल न पेटविल्यास बरे असे माझे वैयक्तिक निश्चित मत आहे

४.    सोबत दुर्बिण असल्यास या ट्रेक चा आनंद खचितच द्विगुणीत होऊ शकेल.

५.    लोणावळा परिसराचा नकाशा (http://deepabhi.tripod.com/images/lonavala.jpg) आणि कंपास असल्याशिवाय घर सोडू नका



पुन्हा भेटू...

सौमित्र साळुंके

२४.१०.२०१२